बदल घडविणारे स्थिर सरकार देऊ, फडणवीसांचा विश्वास

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदला घेणारे नसून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवणारे स्थिर सरकार देणं हे याला आमचे प्राधान्य याला आमचं प्राधान्य असेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात नदीजोड प्रकल्प आणि अधिक गुंतवणूक असणारे प्रकल्प आणणे याला आपले प्राधान्य असून सामाजिक सौहार्द आणि राज्याचा आर्थिक विकास साधणे यावर आपला भर राहील असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील मराठा समाजाला आमच्या सरकारने न्याय दिला, यापुढेही तो अधिकाधिक देण्याचा प्रयत्न राहील असे सांगत , जातीनिहाय जनगणना याचा राजकीय वापर रोखणे आवश्यक आहे . अशी जनगणना करायची झाल्यास त्यातून नेमके काय साध्य करायचे आहे, ते उद्दिष्ट आधी ठरवावे लागेल आणि मगच यावर विचार करता येईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेकांना आपण आज शपथविधीला येण्यासाठी फोन केले होते मात्र ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत असा खुलासा फडणवीस यांनी यावेळी केला. विधानसभेतील विरोधी पक्ष नेता नेमणे हा अधिकार सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा असून ते या संदर्भात जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.