शरद पवार म्हणाले म्हणून आम्ही भाजपाच्या विरोधात

 शरद पवार म्हणाले म्हणून आम्ही भाजपाच्या विरोधात

कोल्हापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तेवर असलेल्या भाजपाकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणूनच याविरोधात ‘इंडिया’ आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असं राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

१५ सप्टेंबरनंतर साखर निर्यात न करण्याचे केंद्राचे धोरण आहे. यानंतर जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर कमी होतील, असा अंदाजही माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यभरात पावसानं ओढ दिल्यानं तोंडाशी आलेली पिकं करपत आहेत, मात्र राज्य सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. आतापर्यंत पंचनामे सुरू करायला हवे होते, पण सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचं यातून दिसून येतं, असा आरोप शरद पवार यांनी केला.

आमदार फुटले म्हणून पक्ष फुटला असं नाही. सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. याविरोधात आम्ही एकजुटीनं काम करणार आहोत. काही आमदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटला असं नव्हे.पक्षात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सभांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही सकारात्मक विचारांची सुरुवात असल्याचं पवार म्हणाले.

सत्तेचा गैरवापर करुन भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीतील फुटलेल्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लावला. यात
मंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. यावरून हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली होती.
मुश्रीफ यांच्या आरोपाला उत्तर देताना शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. पक्षानं अजून तुमच्यासाठी काय करायला हवं? तुरुंगात जाऊन आलेले नेते पक्षाबद्दल काय बोलत नाहीत. मात्र तुरुंगात न गेलेले नेते याबद्दल बोलतात, अशी टीका शरद पवार यांनी मुश्रीफ यांचं नाव न घेता केली.

मणिपूरमध्ये हिंसा घडतेय. याच राज्याला लागून असलेल्या मिझोरामसह अन्य राजांच्या सीमा चीनशी जोडल्या गेल्या आहेत. चीनच्या जवळ असलेल्या या राज्यांमध्ये अशांतता असणं ही गंभीर बाब आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना विनंती केली होती. मात्र केंद्र सरकार सीमा सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

कोण बच्चु कडू

प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील राजकारणावर बोलताना हा पवार काका- पुतण्यांचा हा गेम
असल्याची टीका केली होती. याला उत्तर देताना शरद पवार यांनी कोण बच्चू कडू, असा प्रतिप्रश्न केला? आमदार कडू हे चारवेळा लोकांमधून निवडून आले आहेत असं पत्रकारांनी सांगताच पवारांनी ‘मी राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री राहिलोय’, असा पलटवार केला.

ML/KA/SL

26 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *