पानी पानी रे खारे पानी रे..

मुंबई, दि. 22 (जाई वैशंपायन) :शाळेच्या सभागृहात एकत्र बसलेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षक. आज का बोलवलंय… सगळ्या चेहऱ्यांवर प्रश्नचिह्न.
मुख्याध्यापिका -: आज आपण कार्यक्रम करण्याऐवजी थोड्या गप्पा मारणार आहोत. चालेल?
सगळ्यांनी एकमुखाने होकार भरला. त्या सांगू लागल्या -:
प्रसंग एक-
एका महानगराजवळ विस्तीर्ण लॉनवरचा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडल्यानंतरचा दिवस. दिमाखदार मंडपाची आवरसावर चालू होती. प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या ढकलगाड्यांपैकी दोन गाड्यांबरोबरच्या स्त्रिया काही तरी वेगळं काम करत आहेत, हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपलं गेलं आणि ठेकेदाराने त्यांना बोलावलं. चौकशी केल्यावर काय कळावं? कालच्या समारंभात अर्धवट पिऊन फेकलेल्या पाण्याच्या बाटल्यांतलं पाणी त्या दोघी आपल्या घागरींत भरून घेत होत्या. दोन गल्ल्या पलिकडे त्यांची वस्ती होती. आज हे काम मिळाल्यामुळे पाण्याच्या वेळेत नळावर जायला जमणार नव्हतं. मग इथून निदान पिण्यापुरती सोय झाली तर बरं पडणार होतं. ठेकेदाराने विचारलं – “उष्टं आणि कोणीतरी फेकलेलं पाणी का पिता?” उत्तर आलं – “तर.. आता आमी थोडेच तुमच्यावाणी नव्या बाटल्या फोडून पानी पेनार? गरिबाला उष्टंमाष्टं काई नस्तं वो”. ठेकेदाराच्या डोळ्यात जे तरळलं ते- पाणी खरं की खारं…
मुलं अस्वस्थ झाली. त्या पुढे म्हणाल्या -:
प्रसंग – दोन
मुंबईत एका गगनचुंबी इमारतीतल्या कितव्यातरी मजल्यावरच्या शेजारणींचा गहन प्रश्न- “आजकाल रोज दुपारी तासभर पाणी जातं. इतका प्रॉब्लेम होतो ना मशीन लावायचं म्हणजे..” ते ऐकून फरशी पुसता पुसता मावशीबाई म्हणाल्या, “तुमच्या आटूमाटिक मशीनचा तरासच दिसतोय. आमचं बगा, फरशीवर निस्तं बडवलं आन घासून काढलं का येवड्याशा पान्यात बादलीभर धुनं होतंय”.
मुलांमध्ये जरा खसखस पिकली. त्यांनी पुन्हा सुरुवात केली-:
प्रसंग – तीन
गेल्या महिन्यात सहल म्हणून वॉटरपार्कला जाऊन आलेल्या तुम्हा मुलांचा, या महिन्यात अभ्यासदौरा काढला गेला – शहापूरजवळच्या आदिवासी गावात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अवाढव्य धरणाजवळ राहणारी तहानलेली खेडी, खाचखळगे तुडवत दूरवरून पाणी भरून आणणाऱ्या आपल्याएवढ्या मुली, आणि तरीही माहिती गोळा करायला गेल्यावर आधी गडवाभर पाणी देणारी घरंही तुम्ही जवळून बघितली. आणि मागच्या महिन्यात चढलेलं मस्तीचं पाणी झरझर ओसरलं.
आता मात्र मुलं अंतर्मुख झाली.
कोणीतरी धीटपणे ‘आज हे सगळं सांगायचं’ कारण विचारलं.
तसं बाई म्हणाल्या, आपल्यापैकी कोणीतरी स्वच्छतागृहात गेलं तेव्हा नळाला पाणी नसेल. पण सोडलेला नळ त्या व्यक्तीने बंद केला नाही, कदाचित तिच्यानंतरही अनेक जण गेले असतील, पण कोणीच तो नळ बंद केला नाही. परिणामी, पंप लागल्यावर वरच्या टाक्या भरल्या आणि या सुट्या नळामुळे रिकाम्याही झाल्या. आता काय करायचं ते तुम्ही सांगा…
सगळीकडे एक शांतता पसरली.
एक शिक्षक पुढे झाले. “हे कोणामुळे झालं- हे शोधून काढणं कठीण आहे. पण हे आपल्या शाळेत झालं, त्यामुळे आपण सर्वांनी त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.” ही कल्पना सर्वांना पटली. भराभर उपाय सुचवले गेले. वयोगटानुसार विभागणी करून सगळी योजना आखली गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून अंमलबजावणी सुरू झाली.
लहान वर्गातील विद्यार्थ्यांनी पाणीबचतीचं महत्त्व सांगणारे फलक तयार केले. शिक्षकांनी गाणी बसवून घेतली. नाटुकली बसवली. आणि शहरातून प्रभातफेरी सुरू झाली- रोज एका-एका भागात एक-एक पथक. तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लंबर्स शोधून काढले. शिक्षकांनी त्यांच्याशी बोलणी केली. आणि चक्क, या शाळेची पाणीपथकं रहिवासी संकुलांमध्ये जाऊन घरोघरी फिरली. या पथकांनी काम काय केलं- घरी जाऊन शाळेच्या उपक्रमाची माहिती द्यायची. घरी गळके फुटके नळ आहेत का ते विचारायचं – होकार आल्यास दुरुस्तीची परवानगी घ्यायची नि सोबतच्या प्लंबरबरोबर घरात जाऊन ते दुरुस्त करून घ्यायचे. काही मुलं तर बघून बघून वॉशर वगैरे बदलायलाही शिकली. या पथकांमुळे परिसरातील अनेक नळ दुरुस्त झाले, आणि मुलं पाणीबचतीचं महत्त्व खऱ्या अर्थाने शिकली.
मग पुढच्या जागतिक जलदिनाच्या- २२ मार्चच्या निमित्ताने परंतु त्याआधीच्या रविवारी त्याच सभागृहात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जलदिंडी सजवली गेली. प्रभातफेऱ्यांमधले फलक टांगले गेले, बोलकी चित्रं रंगली, नाटुकली आणि गीतं सादर झाली, पाणीपथकांतील विद्यार्थ्यांनी आणि प्लंबर्सनीही अनुभव सांगितले. आणि मग एका शिक्षिकेने जलदिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेबद्दल सांगितलं.
“२०२४ ची जलदिनाची संकल्पना आहे – वॉटर फॉर पीस- शांतीसाठी पाणी. पाण्यामुळे शांतता प्रस्थापित होऊ शकते आणि पाण्यामुळेच संघर्ष पेटूही शकतात. सुदानचं धगधगतं उदाहरण आपल्याला माहीत आहे. भारताच्या महानगरांमध्येही पाणीटंचाईची, भूजल पातळी अतिशय घटल्याची, तीव्र दुष्काळाची उदाहरणं तयार होऊ लागली आहेत. ही धोक्याची घंटा ओळखणं आपलं काम आहे. आजही जगात २ अब्जापेक्षा अधिक लोकांना पिण्याचं सुरक्षित पाणी मिळवणं हे आह्वान आहे. मला सांगा, आपल्या आदिवासी माता-भगिनींचे कष्ट, त्या गावांची तहान आणि आपले फुटके वाहते नळ- यांचं काही नातं आहे की नाही… निश्चितच आहे. ते उलगडण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी गेल्या काही महिन्यांत केला आहे. आणि मला खात्री आहे, की इथून पुढच्या आयुष्यात, इथे उपस्थित प्रत्येक जण पाण्याबद्दल जागरूक असेल, लोकांना जागृत करेल आणि वर्षभर जलदिन साजरा करेल!”
JW/ML/PGB
22 March 2024