मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. महानगरी मुंबईमध्ये देखील गेल्या आठवड्यापासून तापमान झपाट्याने वाढत आहे. यावर्षी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर म्हणजेच ७ लाख ४७ हजार ४३६ दशलक्ष लिटर इतका आहे.
हा पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका असला तरी मार्च एप्रिल मे महिन्यात कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी व गळतीमुळे पाण्याच्या पातळीत आणखी घट होणार आहे. त्यात बदलत्या वातावरणामुळे पाऊस लहरी झाल्याने जून महिन्यात पाऊस वेळेवर बरसेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.
SL/ML/SL
24 Feb. 2025