९९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड….

 ९९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड….

पुणे दि १४:– सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. साहित्य महामंडळाची बैठक पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीला उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळून्खे, देविदास फुलारी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विलास मानेकर, मराठी साहित्य परिषद, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर, छत्तीसगड मराठी साहित्य संघाचे कपूर वासनिक, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे पुरुषोत्तम सप्रे, मराठी वाड्मय परिषद, बडोदाचे संजय बच्छाव, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे रमेश वंसकर हे घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत.

प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही. संस्थांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावातून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सभेत मतदान घेण्याची वेळ आली नाही. अध्यक्षांनाही त्यांचे मत नोंदवावे लागले नाही.

शनिवारी मार्गदर्शन समितीने संयोजकांसमवेत ठरविलेल्या कार्यक्रमाच्या आराखड्यास साहित्य महामंडळाच्या या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

• हे संमेलन ४ दिवस होणार असून १,२,३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडीअम येथे होणार आहे.
• ग्रंथदिंडी संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून त्याच दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शनाचे, कवीकट्टा आणि बालकुमारांसाठीच्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
• ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस लाभ घेता येणार आहे.
• वक्त्यांच्या भाषणांपेक्षा चर्चेतून परिसंवादातील विषयांना न्याय दिला जाणार आहे.
• निमंत्रितांचे कविसंमेलन, समकालीन गाजलेल्या पुस्तकावरील चर्चा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, नामवंत कादंबरीकारांशी संवाद असे विविध दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत.
• या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व पूर्वाध्यक्षांना, सरस्वती सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निवडक लेखकांना तसेच साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे.

साताऱ्यातील ४ थे संमेलन

साताऱ्यात होणारे हे ४ थे संमेलन आहे. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केल्यानंतर ३ रे संमेलन १९०५ साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते.

शाहू स्टेडीअमवर होणार संमेलन

नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की १९९३ साली ६६ वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे मुख्य मंडप, इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियम मध्ये २५००० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची ८ एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *