भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ
मुंबई, दि. १४ : युद्धामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक विस्कळीत झाल्याने भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना ३० दिवसांच्या व्हिसा मुदतवाढीचा निर्णय भारत सरकारने घेतला असून ओव्हरस्टेवरील म्हणजेच ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात राहिल्यास आकारला जाणारा दंडही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुबई येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लवकरच संपणारे किंवा आधीच संपलेले सर्व व्हिसा आणि ई-व्हिसा एका महिन्यासाठी विनामूल्य वाढवले जाणार आहेत. ही मुदतवाढ संबंधित फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO) मार्फत दिली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, २८ फेब्रुवारीनंतर मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांवर ओव्हरस्टेसाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
तसेच, प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी लागणारे एक्झिट परमिट देखील विनामूल्य दिले जाणार आहे. त्यामुळे उड्डाण सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर नागरिकांना भारत सोडणे सोपे होईल. अधिकाऱ्यांनी असेही स्पष्ट केले की, जर एखाद्या परदेशी नागरिकाला व्हिसा मुदतवाढ किंवा एक्झिट परमिटसाठी अर्ज करता आला नाही, तरीही त्याला स्थलांतर नियमांचे उल्लंघन मानले जाणार नाही.
.युद्धामुळे काही विमाने भारताकडे वळवली गेल्यास अशा प्रवाशांना तात्पुरती उतरण्याची परवानगी (Temporary Landing Permit – TLP) विनामूल्य दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.