गतवर्षी प्रमाणे यंदाही वारकरी दिंड्यांना सरकार अनुदान देणार : आचार्य तुषार भोसले

गतवर्षी प्रमाणे यंदाही राज्यातील दहा मानाच्या पालख्यांच्या सुमारे १,५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ३ कोटी रुपये अनुदान दिले जाणार असून वारकऱ्यांनी कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नये असे आवाहन भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे .
आचार्य भोसले म्हणाले , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहात आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक 28 मे रोजी पार पडली होती . या बैठकीत राज्यातील पालखी सोहळे , वारकरी दिंड्या व त्यांच्यासाठी शासनाने द्यावयाच्या सुविधा आदी विषयी चर्चा झाली . या बैठकीस शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर , ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , राज्यमंत्री माधुरी मिसाळ व राज्यातील सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी , राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्याचे प्रमुख , संस्थानचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते .
याच बैठकीत गतवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी दिंड्यांना अनुदान देण्यात यावे, पावसाच्या पार्श्वभूमीवर जर्मन हंगरचे मजबूत मंडप संपूर्ण पालखी तळांवर उभारावेत, दहा प्रमुख पालख्या व त्यासोबत महाराष्ट्रातील सर्व पालखी सोहळ्यांकडे शासनाने लक्ष द्यावे , सर्व पालखी सोहळ्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा व मदतीची शासकीय व्यवस्था करण्यात यावी, शासनाने सर्व वारकऱ्यांना मोफत रेनकोट उपलब्ध करुन द्यावेत , पालखी मार्ग व ज्या गावात पालखी मुक्कामी राहणार आहे त्या ठिकाणी मांस विक्री करु नये आदी मागण्या करण्यात आल्या होत्या . या सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केल्या असून लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असल्याचे आचार्य भोसले म्हणाले .
आचार्य भोसले म्हणाले , विरोधी पक्षातील काही मंडळी जाणीवपूर्वक वारकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत . परंतु शासन वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देत आहे . गतवर्षी प्रमाणे यंदाही वारकरी दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.