दिशा सालियन प्रकरणी विधिमंडळात गदारोळ

 दिशा सालियन प्रकरणी विधिमंडळात गदारोळ

मुंबई दि. २०– दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले आणि कामकाज तहकूब करावे लागले.

विधानपरिषदेत दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं. माजी महापौरांसह अनेकांवर या याचिकेत राजकीय व्यक्तींवर देखील गंभीर आरोप करण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. या याचिकेत आदित्य ठाकरे ,सुरज पंचोली आणि दिनो मोरीया यांची नावं आहेत तसंच माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि पोलिसांनी दिशाच्या कुटुंबावर दबाव आणल्याचं या याचिकेत नमूद केलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्द्यावर बोलताना केली.

यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर आक्रमक भूमिका घेत सरकारने कुठली करायची ती चौकशी करावी मात्र राजकीय हेतूने प्रेरित चर्चा इथं करू नये अशी भूमिका मांडली. याचं जाणीवपूर्वक राजकारण केलं जातं आहे असा आरोप त्यांनी केला. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना यावर इथे चर्चा होणं उचित नाही असं अनिल परब यांनी यावेळी बोलताना सांगितलं. याप्रकरणी एसआयटीने अहवाल का नाही तसंच संजय राठोड, जयकुमार गोरे आणि किरीट सोमय्या यांच्यावर चर्चा का करत नाही असा सवाल केला. यावेळी भाजपाच्या चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

याच मुद्द्यावरून विधानसभेत ही गदारोळ झाला. दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबतचा मुद्दा अमित साटम यांनी उपस्थित केला, माहितीच्या मुद्द्याद्वारे त्यांनी हा उपस्थित केला. तिच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज, राज्य सरकारमधील माजी मंत्री यात गुंतला असल्याचं ते म्हणाले. सतीश सालियन यांनी संशय व्यक्त केलेल्या सर्व व्यक्तींना अटक करून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली, त्याला अर्जुन खोतकर यांनी पाठिंबा दिला.

सदर प्रकरणात चौकशी सुरू आहे, याप्रकरणी संबंधित न्यायालयाचे आदेश असतील त्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. मात्र संबंधित लोकांना तत्काळ अटक करावी अशी मागणी मंत्री नितेश राणे आणि शंभूराज देसाई यांनी यावेळी केली. त्यानंतर सत्तारूढ पक्षाचे सदस्य जागा सोडून पुढे आले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यातच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचना पुकारल्या, गोंधळ सुरू राहिल्याने कामकाज दहा मिनिटं तहकूब करण्यात आले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *