मंत्री संजय राठोड यांच्या हस्तक्षेपाने उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे, बच्चूभाऊ ही ठरविणार अंतिम भूमिका

 मंत्री संजय राठोड यांच्या हस्तक्षेपाने उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे, बच्चूभाऊ ही ठरविणार अंतिम भूमिका

यवतमाळ दि १३ —
मोझरी येथे जनतेच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग उपोषणाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळाले. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोझरी येथे भेट देत बच्चूभाऊंची सविस्तर भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत सरकारसोबत सकारात्मक चर्चा करण्यात येईल, असा विश्वास दिला.

मंत्री संजय राठोड यांनी या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आगामी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

मंत्री राठोड यांच्या विनंतीला मान देत, बच्चूभाऊंच्या चार कार्यकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यामध्ये ६५ वर्षीय दुर्वास मधुकर जमले, ७० वर्षीय सुमन साळवे, राजेश जयस्वाल आणि कान्होपात्रा खडसे या ज्येष्ठ उपोषणकर्त्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे उपस्थित शिवसैनिक व प्रहार कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

या भेटीनंतर बच्चूभाऊ कडू यांनी लवकरच आपल्या पुढील भूमिकेची घोषणा करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे त्यांच्या उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी सोबत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, जिल्हा प्रमुख अरुण पडोळे, जिल्हा प्रमुख प्रमोद गदरेल, उपजिल्हा प्रमुख गुणवंत हरणे, तालुका प्रमुख मंगेश काळमेघ, उपविभागीय अधिकारी मुंनु मॅडम,तहसीलदार मयूर कळसे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या मध्यस्थीमुळे आता या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *