अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 11. 5 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान
छ.संभाजी नगर, दि. २० : गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये काढणीला आलेले पिक पाऊस आणि गारपिटीमुळे मातीमोल झाले आहे. मराठवाडा विभागात पिकांचे सर्वांधिक नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १६ मार्चपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ११,५०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली.
विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडील आकडेवारीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील ५३३ गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची नोंद करण्यात आली आहे.
“१६ ते १९ मार्च या कालावधीत वीज पडल्याच्या घटनांमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला; मृतांमध्ये हिंगोली येथील गुलाब मरकड (वय ३३) आणि नांदेड येथील दीपिका राठोड (वय १६) यांचा समावेश आहे. याच कालावधीत पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये ४१ जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला,” असे त्यांनी नुकसानीच्या प्राथमिक पाहणी अहवालाचा हवाला देत सांगितले.
SL/ML/SL