शेतमाल वाहून गेलेल्या शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांचा फोन

वाशीम दि २०:– वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचं भुईमुगाचं पीक संपूर्णपणे वाहून गेलं. या संकटसमयी पीक वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र काही क्षणांतच संपूर्ण माल पावसाच्या प्रवाहात गेला. गौरव पवार यांच्या या प्रयत्नांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
या व्हिडिओची गंभीर दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी वाशिम जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करण्याचे निर्देश दिले. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट गौरव पवार यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असं आश्वासनही दिलं.
या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांच्या हस्ते गौरव पवार यांना २० हजार रुपयांची नुकसान भरपाई म्हणून धनादेश प्रदान करण्यात आला. दरम्यान, पावसाच्या पाण्यात वाहून जाणारा शेतमाल वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाची दखल घेत मदत मिळाल्यामुळे गौरव पवार यांनी समाधान व्यक्त करत केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आभार मानले.