उल्हास नदीने ओलंडली धोक्याची पातळी, १२ हजार नागरीकांना हलवणार सुरक्षित स्थळी
कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल 12 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
अवघ्या चार तासात बदलापुरात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसंच पूरस्थिती निर्माण झाल्यास 12 हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था पालिका प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
कल्याण तालुका पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातू कल्याण मुरबाड वाहतूक बंद करण्यात येणार आहे. कल्याण नगर मार्गावरील मुरबाड रोड रायते येथील पुलावरून उल्हास नदीला पाणी लागण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण-मुरबाड मार्ग बंद करण्यात आला आहे. अद्याप पुलावरून पाणी गेले नसले तरी वाहतूक पूर्णपणे थांबवली असून वाहन चालकाला त्रास होऊ नये म्हणून ही वाहतूक टिटवाळा मार्गे वळवण्यात आली असल्याची माहिती कल्याण जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली.