उद्धवजींची शिवसेना ५० चा आकडाही पार करू शकणार नाही

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर, खा. गोपाळ शेट्टी, खा. पुनम महाजन, खा. मनोज कोटक, महामंत्री संजय उपाध्याय आदी उपस्थित होते.*पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वमान्यता*मुंबई शहरातील आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकाचे ऐका मन की बात लोगो की सूनो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात मुंबई शहरात दहा हजार ठिकाणी ऐकली गेली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा प्रवास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. आमचं अन्य पक्षांना आव्हान आहे की, भाजपाच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेला दहा हजार संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले. गरजू महिलांना तसेच २७ हजार कुटुंबांना मदत करण्यात आली.सलग १५ दिवसात ९ मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. विरोधकांच्या पोटात दुखते. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन मोदींना म्हणातात, तुम्ही चांगली लोकशाही राबवत आहात. आपण पुढच्या महिन्यात भोजनासाठी वॉशिंग्टनमध्ये भेटत आहोत. अमेरिकेतील उच्च वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. हे दुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. टीका करणाऱ्यांचे स्वागत आहे. प्रत्येक टीकेतून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही बंद खोलीतून स्वतःच्या मनाशी स्वतः बोलणारे नाही आहोत. आम्ही खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्व आहोत आणि म्हणून कर्नाटकचे निकाल लागले त्यानंतर ज्यांची बोलती इतके दिवस बंद होती ते लगेच बोलू लागले. हे खर आहे की, आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला सत्ता मिळाली नाही. हेही विनम्रतेने सांगू आणि त्याचे आत्मचिंतन आणि परीक्षण करणे आमचं कर्तव्य आहे. त्यामध्ये आम्ही मतदाराने दिलेल्या कौलाचा संपूर्ण विनम्रतेने स्वीकार करून त्याचे विश्लेषण करू. निकालाच्या विश्लेषणाचे काम राष्ट्रीय स्तरावर होईल. पोपटपंची करणारे पोपट बोलायला लागल्यावर मी, मुद्दाम आकडेवारीची माहिती घेतली असे शेलार म्हणाले.
ML/KA/PGB 21 May 2023