उष्माघातामुळे बाराशे कोंबड्यांचा बळी; पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल

सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील आंधळी येथील सीताराम भगवान जाधव यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील १२०० कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग सुरु झाल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने परिसरातील सर्व ब्रॉयलर कोंबडी शेड धारकांचे धाबे दणाणले आहेत.
कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. शेकडो कोंबड्या उष्माघातामुळे मरत आहेत. शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालन करतात. रासायनिक खतांचे भाव प्रचंड वाढल्याने छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. अशा वेळी तीन चार छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा पोल्ट्रीफार्म उभा केला आहे. मात्र अवेळी पडणारा पाऊस, वातावरणात अचानक वाढत असणारा उष्मा आणि वातावरण बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यातच जोडधंदा म्हणून सुरु केलेल्या पोल्ट्री व्यवसायाला वाढत्या तापमानाचा असा फटका बसला असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासनाने या नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यवसायिकांना त्वरित मदत आणि नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
ML/ML/SL
24 May 2024