तुर्कस्तानने घेतली भारतविरोधी भूमिका

नवी दिल्ली,दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत आणि कॅनडा या देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती असताना आता तुर्कस्ताननेही भारताविरुद्ध कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेसाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तेय्यप एर्दोगन यांनी भारतात हजेरी लावली होती. मात्र त्यांनी आता भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या संमेलनात रेसेप एर्दोगन यांनी जम्मू-काश्मीर बाबत चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आशियात स्थिरता आणि विकास साधण्यासाठी काश्मीरमध्ये न्यायपूर्ण पद्धतीने शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरु राहिली तरच हे शक्य आहे, असं रेसेप एर्दोगन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुर्की पुन्हा एकदा आपले रंग दाखवत असल्याचं दिसतंय. रेसेप एर्दोगन यांनी याआधीही पाकिस्तानच्या बाजूने मत प्रदर्शन केले आहे.
भारताची भूमिका ठाम आहे. देशाच्या अंतर्गत प्रश्नावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. एर्दोगन म्हणाले होते की, ‘काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही पाऊलं उचलले जातील, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल.काश्मिर प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी मिळून हा प्रश्न सोडवायला हवा.
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तुर्कीने याबाबत चिंता व्यक्त केली होती. तुर्कीने यूएनजीएमध्ये काश्मिर मुद्द्यावर पाकिस्तानच्या बाजूने मतदान केलं होतं. एर्दोगन यांचे पाकिस्तान प्रेम लपून राहिलेले नाही.
SL/KA/SL
20 Sept. 2023