तुळशी तलाव ओव्हरफ्लो
मुंबई दि.20( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहरातील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव आज मध्यरात्री दीड वाजता ओसंडून वाहू लागला आहे . मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला तुळशी हा पहिला तलाव ठरला आहे. विशेष म्हणजे मुंबई शहरात असणाऱ्या व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या २ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. ८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२ व सन २०२१ मध्ये १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. तर २०२० मध्ये २७ जुलै; २०१९ मध्ये १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये ९ जुलै रोजी; २०१७ मध्ये १४ ऑगस्ट रोजी आणि २०१६ मध्ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होतामुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १ लाख ४४ हजार ७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर (५,७३,३४० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ३९.६१ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. अप्पर वैतरणा तलावात ३,३६०.५० कोटी लीटर (३३ लाख ६०५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. मोडक-सागर तलावात ८,१२१.४ कोटी लीटर (८१ हजार २१४ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. तर तानसा तलावात १०३०३.१ कोटी लीटर (१,०३,०३१ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) ९८०९.५ कोटी लीटर (९८ हजार ९५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. भातसा तलावात २३,१९२ कोटी लीटर (२,३१,९२० दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. तर विहार तलावात १७४२.७ कोटी लीटर (१७ हजार ७२७ दशलक्ष लीटर) पाणीसाठा आहे. तर आज रात्री भरून वाहू लागलेल्या तुळशी तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.