टोमॅटोने पार केली शंभरी

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा सुरू झाला की भाजीपाल्याचे भाव चढायला सुरूवात होते. यावर्षी या दरवाढीत टोमॅटोने बाजी मारली आहे, देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरात बाजारात टोमॅटोचे दर दुपटीने तर काही ठिकाणी त्याहूनही वाढलेत.
सध्याच्या घडीला टोमॅटोचा भाव महाराष्ट्रासह देशभरात १०० ते १२० रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे भाव पडलेले असताना अचानक त्यात मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकाला मात्र फटका बसतोय.
दरम्यान या भाववाढीवर ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितलं की, “टोमॅटोच्या किंमतीत चढउतार सुरु असतात. कारण टोमॅटो लागवडीचा काळ हा संपूर्ण भारतातील विविध भागात वेगवेगळा आहे. त्यामुळं प्रत्येक वर्षी या काळात टोमॅटोचे भाव वाढलेले असतात. सध्या दिल्लीत टोमॅटोचे भाव वाढलेले आहेत. हिमाचल प्रदेशातील शिरमौर आणि सोलन येथून टोमॅटो दिल्लीच्या बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळं आपोआप त्याचे भाव कमी होतील”
उत्तर भारतात टोमॅटोच्या पिकाला फटका बसल्यानं दक्षिण भारतातून इथं टोमॅटो मागवला जात आहे. यासाठी वाहतूक खर्च वाढल्यानं टोमॅटोचा किरकोळ विक्रीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील सध्या बंगळुरु, नाशिक या भागातून टोमॅटो मागवला जात आहे. पण सध्या टोमॅटोचा तुटवडा असल्यानं अनेक ठिकाणी याची साठेबाजी आणि काळाबाजारही सुरु असल्याचं चित्र आहे.
SL/KA/SL
30 June 2022