पर्यटन महोत्सवासाठी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोल माफी

सातारा, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाबळेश्वर येथे येत्या २ ते ५ मे दरम्यान आयोजित महापर्यटन महोत्सवास येणाऱ्या पर्यटकांना वाटेतील प्रवेशकर व वाहनतळ आकारणीमध्ये माफी देण्यात आल्याची वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी महाबळेश्वर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून व मंत्री, मदत व पुनर्वसन, मकरंद जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनातून महाबळेश्वर येथे हा महापर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा पर्यटन उत्सव राज्याचे मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
गुजरातमधील कच्छच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे शंभरहून अधिक तंबू उभारण्यात येणार आहेत. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि ‘वॉटर स्पोर्ट्स’चा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद होईल. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरण देखील होणार आहे.