पराभवानंतरही वचनपूर्तीचा आदर्श! टिटवाळा मातृछाया चाळीत उजेडाची किरणे
टिटवाळा, दि २०
निवडणुकीतील पराभवानंतरही दिलेला शब्द पूर्ण करत माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी इंदिरानगरमधील मातृछाया चाळ येथे रोडलाईट प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून राजकीय प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे. सुमारे तीन लाख रुपयांचा महापालिका निधी विद्युत विभागाला उपलब्ध करून देत या पथदिव्यांची उभारणी करण्यात आली, ज्यामुळे परिसरात उजेड पसरला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या सरनोबत यांनी निवडणूक प्रचारावेळी नागरिकांना दिलेले आश्वासन विसरले नाही. अपेक्षित निवडणूक निकाल न लागूनही त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आणि अखेर रखडलेला प्रकल्प मार्गी लावला.
यापूर्वी या परिसरात अंधारामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना होती. मात्र नव्याने बसवलेल्या रोडलाईटमुळे परिसर अधिक सुरक्षित आणि सुसज्ज झाला असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्घाटन प्रसंगी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरनोबत यांचे आभार मानले. “पराभवानंतरही वचन पूर्ण करणारा नेता दुर्मिळ असतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कृतीमुळे राजकारणात विश्वासार्हतेचा एक सकारात्मक संदेश गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, या उपक्रमामुळे परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची नांदी मिळाली असून, नागरिकांनी भविष्यातही अशाच विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली आहे.KK/ML/MS