या जिल्ह्यातील हजारो हेक्टर भातशेती संकटात

 या जिल्ह्यातील हजारो हेक्टर भातशेती संकटात

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या परतीचा मान्सून सुरू आहे. यावर्षी भात हंगामाच्या सुरुवातीला पेरणी दरम्यान अती पाऊस झाल्याने आणि त्यानंतर भात वाढीच्या अवस्थेत पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.त्यात आता परतीचा पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या कापणीच्या कामात अडथळा येत आहे. यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे या पिकांची कापणी करता येत नसल्यामुळे शेतकरी हतबल असून आतापर्यंत अवघ्या दोन हजार हेक्टरवरील कापणी पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची सूचना देण्यातदेखील अडथळे येत आहेत. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवरील भातपीक संकटात सापडले आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड केली जाते. हळवा, निमगरवा आणि गरवा अशा भातवाणांची लागवड साधारणपणे जिल्ह्यात केली जाते. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत मॉन्सून लांबला आणि त्याचा मोठा परिणाम खरीप हंगामावर दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातील उत्पादन खूपच कमी येणार आहे.

परंतु ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील भातपिकांना जीवदान मिळाले. जिल्ह्यात साधारणपणे ११ हजार ९०० हेक्टरवर हळव्या पिकांची लागवड करण्यात आली आहे. ही पिके गणेशोत्सवापूर्वीच म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परिपक्व झाली. त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भातपीक परिपक्व स्थितीत आहे.

परंतु सप्टेंबरच्या अखेरीपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे उभी पिके आडवी झाली. पाणथळ जमिनीतील पिकांची अवस्था तर बिकटच आहे. जिल्ह्यातील साधारणपणे १५ हजार हेक्टरवरील भातपीक नुकसानीच्या उंबरठ्यावर आहे. अजूनही पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे भातपिकांचे नुकसानदेखील वाढण्याचा अंदाज आहे.

SL/KA/SL

21 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *