बोगस बियाणे विकणाऱ्यांना होणार दहा वर्षांची शिक्षा

अकोला, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त असलेल्या बळीराजाला पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे या मानवनिर्मित संकटाला तोंड द्याव लागतं. त्यामुळे पेरणी हंगाम पुढे सरकतो आणि शेतकऱ्यांची मेहनत तसेच पैसा वाया जातो.या विरोधात कठोर पावले उचलत राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. अकोल्यातील दैनिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना कृषीमंत्री सत्तार यांनी ही घोषणा केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, ज्यांच्याकडे बोगस बियाणे असतील, ज्यांच्याकडे बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.
सध्या मी कृषिमंत्री आहे, आणि कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जर त्यांच्यासाठी काहीच केलं नाही तर शेतकरी मला कधीच माफ करणार नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. पोलिस, महसूल आणि कृषी विभाग या तिघांचे मिळून दोन महिन्यासाठी विशेष पथक तयार करणार अशी आपली कल्पना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव आपण राज्यपालांकडे घेऊन जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने अनेक प्रयत्न आणि उपाय केले असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित आम्ही खरीप हंगामाची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे काम राज्य सरकारने केला असल्याचा दावा त्यांनी केला. जे अधिकारी आणि कर्मचारी पैसे मागतात अशा ठिकाणी छापे टाकण्यात आले होते, असेही सत्तार यांनी सांगितले.
ML/KA/SL
10 June 2023