भारतीय नौदलातील ही ब्रिटीशकालीन प्रथा होणार बंद

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकार भारतीय संरक्षण दलांमध्ये अद्याप अवलंबल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन प्रथा मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानुसार भारतीय नौदलाच्या लोगोमध्ये बदल करण्यात आला आहे. आता केंद्र सरकारच्या आदेशानंतर नौदलानं अजून एक ब्रिटिशकालीन प्रथा तत्काळ बंद केली आहे. नौदलाच्या जवानांद्वारे हातात बॅटन घेऊन जाण्याची प्रथा आता कायमची बंद करण्यात आली आहे.
याबाबतच्या निवेदनात नौदलाने म्हटले आहे की, “इंग्रजांच्या काळात असलेल्या रॉयल इंडियन नेव्हीमध्ये नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धनौकेवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना हातात बॅटन घेऊन जाण्याची प्रथा होती. ही प्रथा भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ७५ वर्षे कायम राहिली, हा जणू एक नियमचं बनला होता.अशा पद्धतीनं नौदलाच्या जवानांनी हतात बॅटन घेऊन जाणं हे इंग्रजांच्या अधिकार क्षेत्राचं प्रतिक मानलं जात होतं. हा वसाहतवादाचा वारसा आम्ही भारताच्या अमृतकालात आम्ही बंद करत आहोत. प्रोव्होस्टसह सर्व कर्मचार्यांकडून अशा प्रकारे बॅटन वाहून नेणं तात्काळ प्रभावानं बंद करण्यात यावं”. मात्र ही प्रथा बंद झाली असली तरी प्रत्येक युनिटच्या प्रमुखाच्या कार्यालयात एक औपचारिक बॅटन ठेवण्यात येणार आहे.
भारतीय नौदलाच्या नवीन चिन्हाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी करण्यात आलं होतं. शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या पार्श्वभूमीवर नौदलाचं नवं चिन्हं शिवमुद्रेच्या आकारामध्ये नौदलाचा अँकर आणि त्यावर भारताची राजमुद्रा तसेच तळाला नौदलाचं ब्रीदवाक्य ‘शं नो वरुण’ असं नवं चिन्ह बनवण्यात आलं आहे.
SL/KA/SL
29 July 2023