आता या गावांना ही लागले इतर राज्यांचे वेध

 आता या गावांना ही लागले इतर राज्यांचे वेध

मुंबई,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील गावांवरील हक्कांबाबत वाद पेटलेला असताना कर्नाटक दररोज काही ना काही कारणास्तव महाराष्ट्राच्या कुरापती काढत आहे. त्यातच आता महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील गावांबरोबरच गुजरात आणि तेलंगणा सीमेवरील महाराष्ट्रातील काही गावे देखीाल त्या त्या राज्यामध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे.

नाशिकमधल्या काही गावच्या ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील काही आदिवासी पाडे आणि गावातील लोकांनी सुरगणाचे तहसीलदारांना याबाबचे निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी गावकऱ्यांसह ही मागणी केली आहे. सुरगणा तालुक्यातील नेमकी गावं कोणती, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या दुर्गम भागातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वीज, पाणी आणि शिक्षण मिळत नाहीये. त्यामुळे या गावांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तर तिकडे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांनी आम्हाला तेलंगणात जायचे आहे, अशी मागणी केलीय. त्यामुळे या भागातली खदखद समोर आली आहे. माहूर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील नागरिकांनी तेलंगणात जायची इच्छा व्यक्त केलीय. तसेच या प्रकरणी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. त्यासाठी “प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे” ही कृती समिती स्थापन करण्यात आलीय.

सीमाभागांतील नागरीकांनी परराज्यात सामिल होण्याची इच्छा व्यक्त करणे, म्हणजे महाराष्ट्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणेच नाही का, असा सवाल आता राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे.

SL/KA/SL

1 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *