राज्यातील विद्यापीठे स्वायत्त , कारवाईचे अधिकार फक्त राज्यपालांचे

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विद्यापीठात परीक्षा, त्यांचे निकाल आदींसाठी होत असलेल्या गैरव्यवहार आणि गोंधळ यासाठी विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सभागृहात दोन प्रश्नांच्या वेळी केला, त्यावेळी राज्यपालांना याबाबत कारवाईची शिफारस करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथील बोगस प्रमाणपत्रे आणि मुंबई विद्यापीठातील परीक्षा निकाल याबाबतचे दोन्ही प्रश्न होते. सभागृहाने कायदा करून विद्यापीठांना स्वायत्तता दिली आहे, त्यामुळे आपण कारवाई केली तर न्यायालयातून ताशेरे ओढण्यात येतात असं मंत्री म्हणाले.
यामुळे आता केवळ राज्यपालांना याबाबत अधिकार असल्यानं त्यांच्याकडे शिफारस करण्यात येईल असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. अनिल देशमुख, नितीन राऊत , योगेश सागर , राम कदम , वर्षा गायकवाड, आशीष शेलार आदींनी अनेक उप प्रश्न विचारत विद्यापीठांच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. The universities in the state are autonomous, the powers of action rest only with the governor
टोलनाके प्रकरण आता केंद्राकडील बैठकीत
सातारा ते कागल दरम्यानच्या रस्त्याचं सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे, हा रस्ता सध्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या ताब्यात आहे , त्यांच्या धोरणा नुसार त्यांनी टोल वसुली सुरू केली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सभागृहात याबाबत उपस्थित प्रश्नाच्या उत्तरात दिली. संजय केळकर यांनी तो उपस्थित केला होता.
सर्व टोल नाक्यांवर गुंडांच्या साहाय्याने टोल वसुली केली जाते , कामे अपूर्ण असताना ही वसुली होते अशा गंभीर तक्रारी शिवेंद्रराजे भोसले, प्रकाश आबिटकर आदींनी ही तक्रार केली होती. अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकार सोबत याबाबत बैठक घेऊन धोरण ठरवावे लागेल अशी मागणी त्यांनी केली. अशी बैठक घेतली जाईल असं मंत्री म्हणाले.
ML/KA/PGB
4 Aug 2023