जम्मू-काश्मीरमधून ३७० हटवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची मोहर

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमधुन संविधानातील अनुच्छेद 370 हटवण्याचा केेद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस संजय किशन कौल, जस्टिस संजीव खन्ना, जस्टिस बीआर गवई आणि जस्टिस सूर्यकांत यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्याचबरोबर कोर्टाने जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय देताना जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचंही म्हटलं आहे. त्याकाळात युद्धाची परिस्थिती पाहून 370 कलम तयार करण्यात आलं होतं. हे कलम तात्पुरतं ठेवण्यात आलं होतं. ते बदलता येऊ शकत होतं. हे कलम निरस्त करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य प्रक्रियेनुसार निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे. भारताच्या अनुच्छेद 1 पासून ते 370 पर्यंत स्पष्ट आहे, असं कोर्टाने म्हणतानाच जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगालाही आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील निवडणुका अधिक लांबवू नका. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या, असे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. राज्याचा दर्जा देण्यात विलंब करू नका, असंही कोर्टाने म्हटलं आहे.SL/KA/SL
11 Dec. 2023