१ कोटी लखपती दीदी बनवण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य

मुंबई,दि. १० : महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र सरकारचे राज्यात एक कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी आम्ही २५ लाख लखपती दिदी तयार केल्या. यावर्षी आम्हाला आणखी २५ लाख जोडायच्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले. मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, “बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ उभारण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले की, “या मॉल्समुळे बचत गटांमधील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी एक मोठे बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारख्या अनेक योजनांचा उल्लेख करत त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. ‘मुद्रा योजने’च्या एकूण लाभार्थ्यांपैकी ६० टक्के महिला आहेत, ज्यामुळे लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली आहे.”
‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना पुढील पाच वर्षे अखंडपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. काही लोकांनी ही योजना बंद होईल, असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ती बंद करणार नाही. उलट, योग्य वेळी आम्ही मदत वाढवू. पुरुषांनी लाभमिळवण्यासाठी पोर्टलवर मोटारसायकलचे फोटो अपलोड केले. आम्ही अशी नावे लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकत आहोत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
SL/ML/SL