राज्य सरकारने केली कांदा खरेदी केंद्रे वाढवण्याची मागणी
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांकडून खरेदी सुरू आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे , ही मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला पाठवले आहे. सध्या नाफेडकडून ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे असलेला उपलब्ध कांदा पाहता या केंद्रांची संख्या वाढवावी अशी विनंती मुख्यमंत्र्यानी या पत्राद्वारे केली आहे.
सध्या राज्यात कांद्याच्या प्रश्नावरून जोरदार घमासान सुरू आहे. निर्यात शुल्क चाळीस टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यावर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. नाशिक आणि परिसरातील कांदा खरेदीच बंद पाडण्यात आली. त्यावर राज्य सरकारने तातडीने हालचाली करून केंद्राशी संपर्क साधला आणि मग दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी २४१० दराने घेण्याचा निर्णय केंद्राने जाहीर केला , तरीही खरेदी बंदच राहिली होती.
शेवटी काल केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यात खरेदी पुन्हा सुरू करण्यात यश मिळविले. मात्र आज तरीही लासलगाव बाजार इथे योग्य दर मिळत नसल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांनी कांदा खरेदी पुन्हा बंद पाडली. इतर ठिकाणी मात्र सुरू होती.
या सगळ्याचा परिणाम राज्यातील किरकोळ कांदा विक्रीवर होत असून कांद्याचा पुरवठा अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने किरकोळ दर चढाच राहिला आहे. यात एकीकडे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार तर दुसरीकडे ग्राहकाला चढ्या भावाने खरेदी अशा कात्रीत सरकार सापडले आहे.आधी खरेदी झालेला कांदा शुल्क न आकारता निर्यात करण्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे तरी कांद्याने वांदा केला आहे हे निश्चित.
ML/KA/SL
24 Aug 2023