सावित्री पात्रातील गाळ शेतकऱ्यांना ठरतोय त्रासदायक

 सावित्री पात्रातील गाळ शेतकऱ्यांना ठरतोय त्रासदायक

महाड, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सन २०२१ च्या महापुरानंतर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीपात्रात आणि तालुक्यातील सावित्री तसेच इतर अन्य नद्यांमध्ये गाळ काढण्याच्या कामाला वेग आला आहे , मात्र काढलेला गाळ टाकण्याबाबत प्रशासनाच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे नदीपात्रातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना त्रासदायक झाला असून महाड जवळील केंबुर्ली येथील हजारो एकर भात शेती या गाळामुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाल्याची तक्रार आहे.

या गावातील नागरिकांनी करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे उघड झाले आहे.
केंबुर्ली गावाच्या हद्दीत सावित्री नदीपात्रातून काढलेला गाळ काढून त्याचे भले मोठे डोंगर रचण्याचे काम येथील ठेकेदार मंडळींनी केल्याने, या गावातील हजारो एकर भात शेती यंदाच्या पावसाळ्यात हा गाळ शेतामध्ये जाऊन नापीक होणार आहे. तसेच हा काढलेला गाळ पुन्हा सावित्री नदीच्या पात्रात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा सावित्री नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यामुळे वाढ होऊन त्यामुळे महाड शहरातील बाजारपेठेत पाणी जमा होण्याचा धोका निर्माण होणार आहे.

याबाबत याच गावातील ग्रामपंचायत सदस्य जाकीर घोले यांनी महाडचे तहसीलदार सुरेश काशीद आणि प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना लेखी निवेदन देऊन विनापरवाना गाळाचे डोंगर उभे करणाऱ्या ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ML/KA/SL

16 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *