प्रभागसंख्या कमी करण्याच्या प्रक्रियेवर पुढील सुनावणीपर्यंत कार्यवाही करणार नाही
मुंबई,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी तत्कालीन मविआ (MVA) सरकारने मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या २२७ वरुन २३६ पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत २२७ केली. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेची (BMC) आधीच रखडलेली निवडणूक आणखी लांबणीवर पडणार आहे. तसेच या सर्वाचा सरकारी तिजोरीलाही मोठा फटका बसणार आहे, असा दावा करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांच्यावतीने अॅड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत याचिका केली आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करून पूर्ववत करण्याचा निर्णय विद्यमान राज्य सरकारने घेतला. त्यावर बोट ठेऊन सत्तांतरण झाले तरीही आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय बदलत नाहीत, निर्णय तेच राहतात, असा दावा ठाकरे गटाकडून सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. प्रभागसंख्या कमी करण्याच्या प्रक्रियेवर पुढील सुनावणीपर्यंत कार्यवाही करणार नाही, अशी राज्य सरकारने याआधी दिलेली हमी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे सरकारतर्फे सोमवारी न्यायालयाला सांगितले.