पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार आशियातल्या सर्वात लांब समुद्रावरील पुलाचे उद्घाटन
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्याच्या या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई आणि महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे, पंतप्रधानांचे दुपारी सव्वाबाराच्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून या सेतूवरून प्रवाससुद्धा करणार आहेत. हा आशियाखंडातील सर्वांत लांब सागरी सेतू आहे.
अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतुक सुविधा अधिक बळकट करून ‘सुलभ गतिशीलतेला’ चालना देणे, पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर 2016 मध्ये झाली होती.
अटल सेतूची वैशिष्ट्ये
- अटल सेतू, एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे 16.5 किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे.
- हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे.
- यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर दरम्यानच्या वाहतुक व्यवस्थेत ही सुधारणा होणार आहे.
अटल पुलाचे उद्गाटन पार पडल्यावर नवी मुंबई येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान 12,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. पूर्व मुक्त मार्गाचे ( ईस्टर्न फ्री वे )ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह ला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची पंतप्रधान यावेळी पायाभरणी करणार आहेत. हा 9.2 किमी लांबीचा बोगदा 8700 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधला जाईल. हा बोगदा मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे ऑरेंज गेट आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल.
त्यानंतर सूर्या या मोठ्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.1975 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून सुमारे 14 लाख लोकसंख्येला यामुळे पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे.
या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान सुमारे 2000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामध्ये ‘उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा’ समावेश आहे ज्यामुळे नवी मुंबईशी स्थानिक संपर्क अधिक वाढेल; कारण नेरुळ/बेलापूर ते खारकोपर दरम्यान असलेल्या उपनगरीय रेल्वेसेवा आता उरणपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून त्याचेही उदघाटन पंतप्रधान करतील.
SL/KA/SL
11 Jan. 2024