सोळा शहरांशी जोडले जाणार नवी मुंबई विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA सुरू झाले असून, सुरुवातीच्या टप्प्यात ते देशातील सोळा प्रमुख शहरांशी थेट जोडले जाणार आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांनी पहिल्या दिवशीच सुमारे ३० देशांतर्गत उड्डाणे सुरू केली आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगर प्रदेशाला दुसरे हवाई प्रवेशद्वार मिळाले आहे. या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.
नवी मुंबई विमानतळावरून सुरुवातीला देशातील १६ प्रमुख शहरांकडे थेट उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, पुणे, जयपूर, लखनऊ, भुवनेश्वर, गोवा, गुवाहाटी, नागपूर, कोची, त्रिवेंद्रम आणि श्रीनगर या शहरांचा समावेश आहे.
NMIA – प्रमुख वैशिष्ट्ये :
- NMIA हे भारताचे आधुनिक विमानतळ असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा यांचा वापर करण्यात आला आहे.
- उद्घाटनानंतरच्या पहिल्या महिन्यात विमानतळ दररोज २३ नियोजित उड्डाणे हाताळणार आहे.
- सुरुवातीला विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत कार्यरत राहील.
- विमानतळावर दर तासाला १० फ्लाइट मूव्हमेंट्स होऊ शकतील.
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई प्रवासाच्या गरजा पूर्ण होतील. तसेच, व्यवसाय, पर्यटन आणि मालवाहतूक यांना मोठा फायदा होईल. मुंबई व नवी मुंबई यांच्यातील मेट्रो आणि जलमार्ग जोडणीची योजना देखील राबवली जात आहे, ज्यामुळे प्रवाशांना विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक मोठी सुविधा ठरणार आहे. सुरुवातीपासूनच सोळा शहरांशी थेट जोडणी झाल्यामुळे देशांतर्गत प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आधुनिक होणार आहे.