नेतृत्वाने आम्हाला सातत्याने गाफील ठेवले

 नेतृत्वाने आम्हाला सातत्याने गाफील ठेवले

कर्जत, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शपथविधी घेण्याअगोदर आम्ही साहेबांची भेट घेतली त्यांना कल्पना दिली मात्र आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले असा थेट आरोप करतानाच राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती धरून सध्याच्या चारही जागा आम्ही लढवू असे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पक्षाच्या वैचारिक मंथन शिबीरात जाहीर केले.

आम्ही दहा – बारा जण देवगिरीला होतो. सुप्रिया सुळे हिला बोलावले आणि आमचा झालेला निर्णय सांगितला. लोकशाहीत बहुमताचा आदर राखला जातो. सात – आठ दिवसात साहेबांशी बोलून सांगतो म्हणाली. आम्ही थांबलोही मात्र तो वेळ गेल्यावर पुन्हा साहेबांना सांगितले. ठीक आहे म्हणाले, वेळ जातोय निर्णय घ्या सांगत होतो. १ मे रोजी मला बोलावून सरकारमध्ये जावा असे सांगितले. मात्र १ मे रोजी सगळे बाहेर असतात म्हणून मग २ मे ला कार्यक्रम ठरला साहेबांनी राजीनामा दिला. मात्र त्यावेळी वातावरण वेगळे निर्माण झाले. तर दुसरीकडे काही लोकांना बोलावून राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करायला सांगण्यात आले. त्यावेळी काही ठराविक टाळकी तिथे होती. मला एक आणि इतरांना वेगळे सांगत होते. ही गोष्ट परिवारातील म्हणून तुम्हाला सांगितले. हे सर्व गाफील ठेवून केले गेले असे अनेक गौपस्फोट अजित पवार यांनी यावेळी केले.

२ जुलैला आम्ही घेतलेला निर्णय आवडला नाही तर मग १७ जुलैला आम्हाला का बोलावले? सगळे आमदार घेऊन गेलो. चहापान झाले, सगळं सुरळीत होणार आहे असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले गेले. १२ ऑगस्टला उद्योगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करत होतो ना. पक्षासाठी काम करत होतो ना? असा सवाल उपस्थित करतानाच काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. संघर्ष यात्रा काढत आहे आयुष्यात कधी केला नाही आता कशाला संघर्ष करता असा टोलाही पवारांनी नाव न घेता रोहित पवार यांना लगावला.

जात निहाय गणना होणे गरजेचे आहे त्याशिवाय कुणाला किती आरक्षण द्यायचे हे ठरले जाईल. मात्र आज अठरापगड जातीत भांडणे होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली असून शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचाराचा हाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न सर्वांना पडत आहे असेही अजित पवार म्हणाले.

आज राज्यात काय सुरू आहे याचा विचार केला पाहिजे. कुळवाडी राजा ही उपाधी महात्मा फुले यांनी दिली. कुळवाडी म्हणजे शेतकरी आहे मात्र आज आपण प्रत्येकाला जाती जातीत विभागले आहे. एखाद्या समाजाचा मुलगा पुढे जात असेल तर इतर जातींनी द्वेष का करायचा. हे योग्य नाही असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

प्रत्येकाकडून समाजा-समाजात चिथावणी देणारी भाषणे होत आहेत. हे थांबले पाहिजे. यातून दंगली घडल्या तर याला कोण जबाबदार आहे. तरुण, गरीब माणूस यामध्ये भरडला जातो त्याचे आयुष्य उध्वस्त होते. राज्यात दंगली घडत असतील तर हा अजित पवार त्या घडू देणार नाही. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी गरीबाचे रक्त सांडू देणार नाही असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला.

कुणाच्या ताटाखालचे मांजर होण्याचे महाराष्ट्राच्या रक्तात नाही. मात्र आज प्रत्येकाची लायकी काढली जात आहे. ही लायकी स्वकर्तृत्वावर तयार होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळयात जात नसते आणि जातीचा अहंकार नसतो. पण आज जाती जातीत वाद निर्माण केला जात आहे. एकोप्याने राहिलो तरच विकास होऊ शकतो. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हायला हवी ही मागणी आहे असेही आरक्षण मुद्दयावर बोलताना अजित पवार म्हणाले.

ML/KA/SL

1 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *