अखेर सरकार करणार बिबट्यांची नसबंदी
मुंबई, दि. ४ : पुणे जिल्हा व परिसरात बिबट्यांनी हैदोस घातला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकरणी केंद्राकडे परवानगी मागण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणालेत.
पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात सध्या नरभक्षक बिबट्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 लहान मुले व एका वृद्ध महिलेचा बळी गेला आहे. यामुळे या भागातील नागरिक चांगलेच संतापलेत. त्यांनी सोमवारी पुणे – नाशिक हामार्गावर तब्बल 16 तास रास्ता रोको केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्यांची नसबंदी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे संकेत दिले.
पुणे व नगर जिल्ह्यात जवळपास 1300 बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी केंद्र सरकारशी चर्चा केली आहे. मी केंद्रीय वनमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही या प्रकरणी माझी भेट घेतली. त्यांनी अतिशय गंभीरपणे हा मुद्दा मांडला.
आम्ही केंद्र सरकारला हे बिबटे पकडून रेस्कु सेंटरला हलवण्याची परवानगी देण्याची विनंती करणार आहोत. तसेच बिबट्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम आखण्याचाही आमचा विचार सुरू आहे. तशी परवानगी आम्ही केंद्राकडे मागितली आहे, असे ते म्हणाले.
SL/ML/SL