बोगस बियाण्यांबाबत कायदा बनविण्याचा अधिकार सरकारला आहे
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याला बोगस बियाणे संदर्भात कायदा करण्याचा अधिकार असून तो याच अधिवेशनात केला जाईल अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा मुद्दा अनिल देशमुख यांनी उपस्थित केला होता. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही असा कायदा राज्य सरकार करू शकते असं यावेळी स्पष्ट केलं.
नवीन कायद्यात पहिल्या गुन्ह्यात केवळ बोगस बियाणे उत्पादक कंपन्या नाच जबाबदार धरलं जाईल , मात्र कृषी सेवा केंद्राने जाणीवपूर्वक शेतकर्याला फसवले असेल तरच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे मुंडे यांनी सांगितलं. याबाबतचे उप प्रश्न किशोर पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, समीर कुणावर आदींनी विचारले.तेलंगण राज्यांत असा कायदा झाला असून त्यानंतर बोगस बियाणे तक्रारीत ८० टक्के कमतरता आली आहे असं मंत्री म्हणाले.
बोगस बियाणे, खते आदींच्या तक्रारींसाठी दिलेल्या वॉट्स ॲपवर आतापर्यंत ३,४९१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यातील ३९२ तक्रारी बोगस बियाणे , २१० तक्रारी खतांबाबत आहेत त्याची दखल विभागाने घेतली असून तपास सुरू असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. विभागाने असे प्रकार रोखण्यासाठी १,१३१ निरीक्षक नेमले आहेत तर ३९५ भरारी पथकांची नेमणूक केली आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
ML/KA/SL
26 July 2023