अबब … तब्बल पाचशे कोटींचा मुद्देमाल राज्यात झाला जप्त

मुंबई, दि. १२(एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध प्रलोभने दाखवली जात आहेत. यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मुद्देमालाची वाहतूक सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या सतर्कतेमुळे गेल्या महिन्याभरात ५०० कोटींहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाकडून डोळ्यात तेल घालून राजकीय पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे.
आयोगाच्या आदेशानुसार विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादींचा ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
सर्वाधित १३८ कोटी १८ लाखाची मालमत्ता मुंबई उपनगर जिह्यातत पकडण्या आली असून मुंबई शहर जिल्ह्यात ४४ कोटी ५० लाख, नागपूरमध्ये ३७ कोटी, ठाण्यात १६ कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
राज्यात आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्याच आठवड्यात रुग्णवाहिका, पोलिसांच्या गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या कारवाया वाढल्या आहेत.आज प्रचार दौऱ्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरही तपासण्यात आले.
SL/ ML/ SL
12 Nov. 2024