शेतकऱ्याने केली लाडक्या वळूची आगळीवेगळी तेरवी…

 शेतकऱ्याने केली लाडक्या वळूची आगळीवेगळी तेरवी…

वाशिम, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : वाशिम जिल्ह्यातील भटउमरा या वारकरी परंपरेने समृद्ध असलेल्या गावात एक आगळीवेगळी घटना घडली. गावकऱ्यांच्या लाडक्या वळूच्या निधनानंतर माणसांप्रमाणे त्याच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तेरवीचा विधी पार पडला.

तेरवीच्या दिवशी गावातील बैलांना गोड नैवेद्य खाऊ घालण्यात आला, तसेच गावकऱ्यांना सामुदायिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली तसेच गावातील शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यासाठी या प्रसंगी शेला – टोपी देऊन सत्कार करण्यात आला. ही परंपरा गावातील वारकरी संप्रदायाच्या संस्कारांमुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेली असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

भटउमरा गावातील बैल हा केवळ शेतातील कामासाठी नसतो, तर तो कुटुंबाचा भाग मानला जातो. त्याच्या मृत्यूनंतरही मानवी सन्मान दिला जातो. बैल आमच्या शेतीचा आणि कुटुंबाचा आधार आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्यानंतरही सन्मान दिला जातो,असं गावकरी अभिमान काळे यांनी सांगितलं. भटउमरा हे गाव वारकरी संप्रदायाच्या संस्कारांनी नटलेलं असून, बैलांच्या मृत्यूनंतर माणसांप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची प्रथा या गावात कायम राखली गेली आहे. गावातील सर्वच नागरिक या विधींमध्ये सामील होतात आणि सामुदायिक एकतेचं दर्शन घडवत आहेत.

शेतकरी, बैल, आणि गावकरी यांच्यातील स्नेहाचे हे उदाहरण इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. बैलांना गोड नैवेद्य खाऊ घालण्यापासून ते सामुदायिक भोजनापर्यंत सर्व विधी हे गावातील एकतेचं आणि संस्कृतीचं प्रतीक बनले आहेत.
ही प्रथा फक्त भटउमरा गावापुरती मर्यादित नसून, इतर गावांसाठीही आदर्श ठरू शकते. शेती आणि पशुधन यांचं महत्त्व समजून घेतलं तर ग्रामीण भागातील जीवनशैलीचा अभिमान नक्कीच वाढेल.

ML/ML/SL

29 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *