शेतकऱ्याने ठरवलं आणि सेंद्रिय शेतीत केशर आंबा बहरला…
जालना दि २० : (अनंत साळी)
जालना तालुक्यातील कडवंची आणि मंदापूर या गावांची ओळख मराठवाड्यातील द्राक्षाचे हब म्हणून झालेली. परंतु गेल्या 3/4 वर्षात पाण्याची कमतरता,अवकाळी मुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले.कित्येकांनी द्राक्षांच्या बागांवर रोटाव्हेटर फिरवले,
कित्येकांनी कुऱ्हाडीने द्राक्षांचे वेल तोडून टाकले. नंदापूर येथील वनस्पती शास्त्रात M.sc झालेल्या भरत उबाळे यांच्या वडिलांचं वय झालेलं असल्याने पारंपरिक शेतीची जबाबदारी भरत यांच्यावर आली.त्यामुळे जॉब न शोधता भरत यांनी शेतीत कष्ट करायचं ठरवलं.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा सध्याच्या परिस्थितीचा विचार करून वनस्पतीशास्त्रात M.sc झालेल्या नंदापूर येथील भरत उबाळे यांनी विचारपूर्वक आंबा शेती करण्याचे ठरवले. त्यासाठी आंब्याचे कलम विकत आणण्याऐवजी त्यांनी चांगल्या प्रतीच्या 1000 कोया लावल्या. आंब्याचे रोप चांगले वाढल्यावर त्यावर केशर चे कलम केले.
खड्डेकरून शेणखताची मात्र दिल्याने कोय चांगली रुजली गेली आणि भरत यांच्या शेतातील 1 हजार केशर झाडे बहरात आली.केशर आंब्याचा रंग आणि चव खूपच सुंदर आल्याने त्यांच्या केशर आंब्याला प्रचंड मागणी वाढली आहे.आंब्याची बाग व्यापाऱ्यांना न विकता त्यांनी ग्राहकांना थेट आंबा पुरवण्याचे ठरवले.मागच्या वर्षीचा अनुभव बघता,ग्राहकांची मागणी बघून भरत यांनी जालन्यात घरपोच आंबे पोहचवण्याची सोय केली आहे.याशिवाय चोखंदळ ग्राहक थेट त्यांच्या शेतात येऊन आंबे घेऊन जातात.
त्यामुळे केशर आंब्याच्या गुणवत्तेत किंचितही फरक पडू नये यासाठी त्यांनी आंब्यांच्या झाडाना साडीचे आच्छादन देऊन आंब्याची ऊन आणि कीटकांपासून काळजी घेतली आहे.आंबे लहान असतानाच त्याच्यावर कागदी पिशवी लावल्याने आंब्याचे उत्पादन तर जोरदार आलेच आहे, शिवाय कुठलीच रोगराई होण्याची शक्यता राहिली नाही. 40/42 च्या तापमानात फळांना कुठलाच फरक पडला नाही.
द्राक्ष शेतीला अवकाळी,कमी पाणी आणि याच्या तडाख्याने ग्रासले असताना अभ्यासपूर्ण रीतीने जमिनीचा पोत,पाण्याचे योग्य नियोजन आणि कागदी पिशवी,साडी आच्छादन या पद्धतीचा वापर करून भरत उबाळे केशर आंब्याचे भरघोस उत्पादन घेत आहेत.त्यांच्या सारखा अभ्यासपूर्ण विचार करून सगळे करतात त्या मागे न धावता असा अनोखा प्रयोगही यशस्वी होतो हे भारत उबाळे यांनी दाखवून दिले आहे.