NEET-JEE च्या काठीण्यपातळीची होणार पडताळणी

मेडिकल, इंजिनिअरिंग आणि महाविद्यालय प्रवेशासाठी नीट, जेईई आणि सीयूईटीची (यूजी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी. या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी गरजेपेक्षा जास्त कठीण तर नाहीत ना, याची पडताळणी शिक्षण मंत्रालय करत आहे. मंत्रालयाची उच्च अधिकार समिती ४ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे मानसशास्त्रीय विश्लेषण करणार आहे. सोबतच या प्रश्नपत्रिका सीबीएसईसह सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी किती अनुकूल आहेत, हेही पाहिले जाणार आहे. समिती लवकरच याबाबत मंत्रालयाकडे आपला अभिप्राय (शिफारसी) देणार आहे. या आधारे उत्तम परीक्षेचे डिझाइन आणि प्रश्नांच्या निवडीची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) २०२६ च्या प्रवेश परीक्षांपासून समितीच्या या शिफारशी लागू होऊ शकतात.
मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, ‘या परीक्षांचे प्रश्न इतके अवघड असतात की, कोचिंग वा खास प्रशिक्षणाशिवाय १२ वी चे सरासरी विद्यार्थीही ते सोडवू शकत नाहीत, अशा तक्रारी आल्या आहेत. एका परीक्षेची वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या कॉम्प्युटर बेस्ड पेपरची काठिण्य पातळी वेगवेगळी असते. काही बोर्डांचे विद्यार्थी आउट ऑफ सिलॅबस प्रश्नांच्याही तक्रारी करतात.’ मात्र, या अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, ‘काठिण्य पातळी कमी करणे याचा अर्थ कुणीही उमेदवार सोडवू शकेल इतकी ही प्रक्रिया सोपी केली जाणार नाही. प्रश्नांची काठिण्य पातळी सरासरीहून अधिक मात्र अशक्यच्या खाली असेल. सर्व प्रवेश परीक्षा १२ वीच्या अभ्याक्रमावरच आधारित असाव्यात, हे निश्चित करणे हाही याचा हेतू असेल.
पुढील मुद्द्यांची होणर पडताळणी
मानसशास्त्रीय विश्लेषणात हे पाहिले जाते की, एखादा प्रश्न किती समजूतदारपणे विचार करण्याची मागणी करतो? प्रश्न विद्यार्थ्याची वास्तविक समज आणि क्षमता योग्यपणे जोखत आहे की नाही? नीट, जेईई आणि सीयूईटीच्या (यूजी) ४ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे या आधारावर अध्ययन होणार आहे… काठिण्य पातळी : प्रश्न चांगली आणि कमी तयारी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किती फरक करू शकले? एकूण गुण आणि कटऑफवर काय परिणाम झाला? एका स्तराची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण समान राहिले की नाही? अचूक उत्तराच्या टक्केवारीच्या आधारावर याचे आकलन केले जाणार आहे. प्रश्नाची समज : प्रश्न भ्रामक वा पक्षपाती तर नाहीत ना? सर्व वर्गातील, भाषा आणि राज्यांतील विद्यार्थ्यांना पेपरची समान संधी मिळाली काय? हे प्रश्न मेडिकल, आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक कौशल्य व ज्ञानाच्या मूल्यांकनासाठी अचूक आहेत काय? विद्यार्थ्यांनी किती प्रश्न अंदाजे सोडवले? अंदाजे सोडवल्यानेच पेपरला अधिक चांगले गुण मिळू शकले असते, असा पेपर होता काय? स्टॅटिस्टिकल मॉडेलचाही वापर केला जाणार आहे. त्यातून गुणांऐवजी विद्यार्थ्यांची खरीखुरी क्षमता जोखली जाईल. सर्वश्रेष्ठ आणि सर्वात सुमार कामगिरीच्या आधारावर आकलन केले जाणार आहे.