देशाने गाठला एक हजार किमी चा मेट्रो रेल्वे सेवेचा टप्पा

 देशाने गाठला एक हजार किमी चा मेट्रो रेल्वे सेवेचा टप्पा

मुंबई,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेट्रो रेल्वेमुळे देशातील महानगरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सहज आणि सुखकर केला आहे. वातानुकूलित आणि कमी गर्दीतून प्रवासाची सेवा मिळत असल्याने नागरिक आता मेट्रो सुविधाचे अधिकाधीक लाभ घेत आहेत. देशातील मेट्रो रेल्वे सेवेने आज १ हजार किमीचा टप्पा गाठल्याची महत्त्वाची माहिती आज पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात दिली. आजच्या दिवसाने भारताच्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड पार करत ऐतिहासिक यशाची नोंद केली असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात नमूद केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा विस्तार करणे आणि नागरिकांसाठी प्रवासात सुलभता सुनिश्चित करणे हे या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतातील मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे आता एक हजार किलोमीटरपर्यंत विस्तारले असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. ही अत्यंत उल्लेखनीय कामागिरी असल्याचे म्हणत त्यांनी भारताच्या या यशाची प्रशंसाही केली.

2014 मध्ये जेव्हा देशाने आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिली, त्यावेळी मेट्रो रेल्वे सेवा जोडणीच्या बाबतीत जागतिक पातळीवर भारताचे स्थान पहिल्या दहा क्रमांकामध्येही नव्हते, मात्र त्यानंतर गेल्या दहा वर्षांत भारत मेट्रो रेल्वे सेवा जाळ्याच्या विस्ताराच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला असल्याची बाबही पंतप्रधानांनी ठळकपणे अधोरेखित केली. आपल्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे असेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

2014 च्या आधी, भारताचे मेट्रो जाळे एकूण फक्त 248 किलोमीटर लांबीचे होते आणि केवळ पाच शहरांपुरते मर्यादित होते, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या दहा वर्षांत भारतात एकूण 752 किलोमीटरहून जास्त लांबीच्या नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यात आले आहे, असे त्यांनी ठळकपणे निदर्शनास आणून दिले. आज देशभरातील 21 शहरांमध्ये मेट्रो सेवा कार्यरत आहेत,तर 1,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे मेट्रो मार्ग सध्या वेगाने विकसित होत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

दोन नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन आणि पायाभरणी यासह, दिल्ली मेट्रो मार्गाचा विस्तार यांची नोंद घेत मोदींनी, गुरुग्राम नंतर आता हरयाणाचा आणखी एक भाग मेट्रो जाळ्याशी जोडला जात आहे यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की, रिठाला-नरेला-कुंडली मार्गटप्पा, हा दिल्ली मेट्रो जाळ्याच्या सर्वात मोठ्या विभागांपैकी एक असेल. हा टप्पा, दिल्ली आणि हरयाणामधील प्रमुख औद्योगिक केंद्रांना जोडणारी दळणवळण व्यवस्था मजबूत करेल आणि लोकांचा प्रवास सुकर करेल, असेही ते म्हणाले.

भारत सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे दिल्लीतील मेट्रो मार्गांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करत, ते म्हणाले की 2014 मध्ये दिल्ली- राष्ट्रीय राजधानी क्षेत्र एनसीआरमधील एकूण मेट्रो जाळे, 200 किलोमीटरपेक्षा कमी होते आणि आज ते दुपटीने वाढले आहे.

“गेल्या दशकभरात, सरकारचे प्राथमिक प्राधान्य पायाभूत सुविधांच्या विकासावर आहे”, असे मोदी म्हणाले. त्यांनी नमूद केले की, दहा वर्षांपूर्वी पायाभूत सुविधांसाठीची नियोजित आर्थिक तरतूद सुमारे 2 लाख कोटी रुपये होती, ती आता 11 लाख कोटीं रुपयांहून अधिक झाली आहे. ते पुढे म्हणाले की आधुनिक दळणवळण व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे, विशेषत: यात शहरांतर्गत दळणवळण आणि एक शहर दुसऱ्या शहराला जोडणे, यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की, आता दिल्लीतून निघून विविध शहरांमध्ये पोहोचणारे द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) तयार होत आहेत आणि दिल्ली औद्योगिक पट्ट्याशी जोडली जात आहे. त्यांनी नमूद केले की एनसीआरमध्ये, एक मोठे बहुपेडी मालवाहतूक केंद्र (मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब) विकसित केले जात आहे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये दोन रेल्वे मालवाहतुक मार्ग (फ्रेट कॉरिडॉर) एकत्र येऊन मिळत आहेत. हे प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासात आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात हातभार लावत असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. “आधुनिक पायाभूत सुविधा गरीब आणि मध्यमवर्गासह प्रत्येकासाठी सन्माननीय आणि दर्जेदार जीवनाची हमी मिळवून देण्यात मदत करत आहेत”, असे ते पुढे म्हणाले.

SL/ ML/ SL

5 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *