केंद्र सरकारकडून ३५ रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात रहावे यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या कृप्त्या लढवत असते. कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ३५ रुपये किलोने कांदा देण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार नॅशनल को ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स युनियन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मोबाईल व्हॅन आणि रिटेल आउटलेटद्वारे कांदा विकणार आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राष्ट्रीय राजधानीतील कृषी भवन येथे मोबाईल व्हॅनमधून कांद्याची विक्रीला सुरूवात केली. जोशी म्हणाले की, सरकार येत्या काही दिवसांत मुंबई, कोलकाता, भुवनेश्वर, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, गुवाहाटी आणि रायपूरमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे कांद्याच्या भावात ही वाढ झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
पावसामुळे महाराष्ट्रातील रस्ते ठप्प झाले असून, त्यामुळे कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. येत्या काही दिवसांत दर आणखी वाढू शकतात.कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांदा बफर स्टॉकमधून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सणासुदीच्या काळात त्याच्या किंमती नियंत्रित ठेवता येतील.
SL/ML/SL
6 Sept 2024