विक्रोळीतील रत्नबोधी विहारात परिवर्तनाची नांदी
मुंबई प्रतिनिधी : विक्रोळी (पूर्व) येथील बौद्धजन सेवा संघाच्या रत्नबोधी विहाराची कार्यकारिणी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली असून, १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या कालावधीसाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे विहाराच्या कामकाजात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवडणुकीत विविध क्षेत्रातील अनुभवी, सामाजिक जाण असलेले व संघटन कौशल्य असलेले कार्यकर्ते निवडून आले आहेत. अध्यक्षपदी प्रवीण भागवत केदारे यांची निवड झाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विहाराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उपाध्यक्षपदी दिपक शंकर पगारे, तर उपाध्यक्षा म्हणून निर्मला गंगाधर गवळी यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी जगदीश मधुकर गवारे यांच्यावर प्रशासनिक जबाबदारी सोपवण्यात आली असून, चिटणीस म्हणून आनंद शंकर घोक्षे आणि सुवर्णा रघुनाथ टिळक हे कार्य पाहणार आहेत.
आर्थिक नियोजन आणि पारदर्शक कारभारासाठी खजिनदार म्हणून भूपेंद्र प्रकाश हिरे यांची निवड करण्यात आली आहे, तर उपखजिनदार म्हणून राजेश राणोजी साळवे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. सदस्य म्हणून अरविंद हरिभाऊ जाधव, वैभव माधवराव झेंडे आणि विशाल सोपान कांबळे यांचा कार्यकारिणीत समावेश असून, ते विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावणार आहेत.
नव्या कार्यकारिणीकडून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, युवकांना मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, वाचनालय उभारणी, तसेच संविधान व सामाजिक जागरूकतेसाठी विविध कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. परिसरातील नागरिकांना एकत्रित आणून समाजहिताचे उपक्रम राबविणे, हेही या कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
रत्नबोधी विहार हे विक्रोळी परिसरातील बौद्ध समाजाचे एक महत्त्वाचे आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र मानले जाते. येथे नियमित धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, शिंदे सेना ईशान्य मुंबई अनुसूचित जाती-जमाती जिल्हा प्रमुख राजेश पडांगळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.