पानिपतचे युद्ध ‘एक है तो सेफ है’ ची शिकवण देणारे युद्ध
पानिपत, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पानिपतच्या युद्धातून ‘एक हैं, तो सेफ हैं’ हे शिकावे लागेल! छत्रपती शिवाजी महाराजांची देव, देश आणि धर्मरक्षणासाठी एकत्र येण्याची शिकवण या युद्धात आचरली गेली असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘264 व्या शौर्य दिवस समारंभा’साठी पानिपत, हरियाणा येथे सहभाग घेतला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर स्वराज्यासाठी लढणार्या हिंदवी स्वराज्याची सेना आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये 1761 साली झालेल्या भीषण युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी मराठ्यांच्या रक्ताने सिंचित पानिपतच्या या वीरभूमीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन देखील केले.
पानिपतच्या या मोहिमेत मराठ्यांचा पराभव होण्याचे कारण म्हणजे सर्व राजे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी एक होऊ शकले नाहीत, हे सांगताना ‘एक हैं, तो सेफ हैं’ चे महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले. या मोहिमेत जरी मराठे पराभूत झाले, तरीही पुढील 10 वर्षातच महादजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात दिल्ली जिंकून मराठ्यांनी स्वराज्याची स्थापना केली.
विकसित भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात सर्वांनी एक होऊन देश विघातक शक्तींचा सामना करण्याची गरज देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपतच्या शौर्यभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प केला आणि शौर्य स्मारकासाठी आवश्यक जमिनीच्या विस्तारासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अद्याप मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन योग्य मूल्य भरून जमीन अधिग्रहित करेल, असे आश्वासित केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शौर्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
ML/ML/SL
14 Jan. 2025