मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी या अष्टपैलू खेळाडूची वर्णी

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यामुळे त्याला वर्ल्ड कप सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र आता त्याला एक उत्तम संधी मिळाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याची निवड करण्यात आली आहे.
तब्बल दशकभर मुंबईचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माची जागा आता हार्दिक पंड्या घेणार आहे.आता रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली २०२२ साली गुजरात टायटन्सनं आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. दोन वर्षे गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या हार्दिकनं पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केलं आहे.
सचिन तेंडुलकर, हरभजन सिंह, रिकी पाँटिंगपासून रोहित शर्मापर्यंत अनेक गुणवान खेळाडूंनी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. प्रत्येक कर्णधारानं त्या-त्या वेळी संघाच्या यशात योगदान दिलं आहे. त्यासोबच मुंबई इंडियन्स नेहमीच भविष्याचा वेध घेत त्यासाठी तयार राहण्याचे प्रयत्न केले आहेत. संघ बांधणीवर जोर दिला आहे. याच धोरणाला अनुसरून हार्दिक पंड्याकडं नेतृत्व देण्यात आलं आहे, असं मुंबई इंडियन्सचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यानं सांगितलं.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं दोन स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यापैकी एका स्पर्धेत त्याच्या संघान आयपीएलचं जेतेपद मिळवलं होतं. विशेष म्हणजे, गुजरातकडून खेळण्याआधी २०१५ ते २०२१ पर्यंत तो मुंबई इंडियन्सच्या संघात होता. यावेळी पुन्हा मुंबईनं १५ कोटी रुपये मोजून त्याला संघात घेतलं आहे.
रोहित शर्मानं २०१३ साली मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईनं पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. आयपीएलच्या इतिहासातील हा एक विक्रम आहे. मुंबई इंडियन्स २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये चॅम्पियन ठरली होती. मुंबई व्यतिरिक्त चेन्नईनं एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे.
SL/KA/SL
15 Dec. 2023