ठाण्यातील गोरक्षक अतुल पेठे यांना ‘भारत गौरवरत्न’

ठाणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):
ठाण्यातील गोरक्षक आणि शहापूर तालुक्यातील अघई येथील सुचिता पेठे बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा अतुल सुचिता जयंत पेठे यांचा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिल्ली येथे “भारत गौरव रत्न” पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
अतुल पेठे यांच्या समाजसेवी कार्याची दखल घेऊन भारत गौरव रत्न सन्मान समितीच्यावतीने हा सोहळा ०४ जून रोजी दिल्ली येथे पार पडला. सन्मानमूर्ती अतुल पेठे यांच्यावर सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील अघई येथे सुचिता पेठे बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट असून धार्मिक, क्रीडा प्रोत्साहन, शिक्षण आणि सामाजिक कार्यामध्ये संस्था कार्यरत आहे.
सुचिता पेठे या संस्थेच्या अध्यक्ष असून अतुल पेठे सचिव आहेत. संस्थेतर्फे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. तसेच ज्यांना शिकायचे आहे, पण आर्थिक अडचणीमुळे शिकू न शकणाऱ्या विद्यार्थ्याची शाळेची फी भरून त्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले जाते. अघई येथे संस्थेची गोशाळा असून याठिकाणी गोमाते सोबतच नंदीचाही सांभाळ केला जातो.
दगडातील नंदीला सगळेच पुजतात पण खऱ्या नंदीला मात्र वाऱ्यावर सोडून दिले जाते. शेतकरीही बैलाचा जन्म झाल्यावर काही उपयोग नसल्याने बेवारस सोडून देतात.गुजरात राज्यात गोपालनाबाबत जागरूकता आहे, कारण गुजरात सरकार शेतकऱ्यांना जितकी प्रेरणा देते तितकी प्रेरणा महाराष्ट्रासारख्या कृषी प्रधान राज्यात दिली जात नाही अशी खंत अतुल पेठे व्यक्त करतात. दरम्यान, संस्थेतर्फे नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात असून कोविड काळात तर तब्बल २१ आदिवासी पाडे दत्तक घेऊन त्यांना अन्नधान्य तसेच आरोग्यसुविधा मोफत पुरवण्यात आल्याचे पेठे यांनी सांगितले.
याशिवाय आदिवासी आणि इतर मुलांसाठी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. तसेच वृद्धाश्रमाचे देखील काम सुरु आहे. संस्थेच्या आवारात असलेल्या स्वामी समर्थांच्या सुसज्ज मठामध्ये विविध धार्मिक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जात असल्याचे अतुल सुचिता जयंत पेठे यांनी सांगितले.
ML/KA/PGB 6 Jun 2023