ठाण्यासह एमएमआर क्षेत्राच्या विकासाकरीता कटीबद्ध…

 ठाण्यासह एमएमआर क्षेत्राच्या विकासाकरीता कटीबद्ध…

ठाणे दि ८ : ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील मुलभुत गरजांसह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या वाहतुक कोंडी, कचरा आणि पाणी पुरवठयाच्या समस्यांवरील कृतीशील आराखड्याचे सविस्तर विवेचन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांना आश्वस्त केले. राजकारण विषयक कमी पण पर्यावरणपुरक विकासाचे व्हीजन मांडुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यातील शहरांची रूपरेषा आकडेवारीसह उलगडली.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चासत्र ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे बुधवारी पार पडले.ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे, प्रदेश सचिव माधवी देसाई, भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
देवाभाऊंच्या या विशेष चर्चासत्राच्या २४ ठिकाणी केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणाला ठाणेकरांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

ठाणेकरांच्या मनातील प्रश्न, शहराचा विकास आणि सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ठाणे तसेच एमएमआर क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या पाच वर्षातील मेट्रो संकल्पपूर्तीचा तर २०३० पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी कनेक्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला.कोस्टल रोडचीही कनेक्टीव्हीटी रिंग करून सर्व वाहतुक भविष्यात शहराबाहेर नेऊन कोंडी कमी करणार असल्याचे स्पष्ट करताना शेवटच्या व्यक्तीपर्यत कनेक्टीव्हीटीचे नियोजन केले असल्याचे सांगितले.

घनकचऱ्याच्या आणि डंपिंगच्या समस्येवर त्यांनी भविष्यातील उपाय सांगताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीजन नुसार पुढच्या तीन चार वर्षात सर्व डंपिंग बंद करून बायो मायनिंग प्रकल्प सुरू करणार असल्याचे सांगितले.एमएमआर क्षेत्राचा ग्रोथ हब असा विकास, घोडबंदर रोडची समस्या सुटण्यासाठी २०० नॉटीकल्स माईल्सचा विचार करून कोलशेत – दिवा येथे पाच जेटी उभारणार, तसेच वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याच सांगुन ठाण्यात इन्क्युबेशन सेंटर बाबतचे नियोजनही फडणवीस यांनी सविस्तरपणे मांडले.

  • तीन वर्षात पाणी समस्या सोडवणार पोशीर आणि पेल्हार या दोन धरणाचे काम पुढील तीन वर्षात पुर्ण करणार आहोत. तसेच, मागील २५ वर्ष रखडलेल्या गारगाई प्रकल्पाला वन विभाग परवानगी देत नव्हते. त्यांची अडचण त्या भागातील पाच गावे होती, ती गावे विस्थापित होणार होती, गावातील नागरिकांशी चर्चा केली असता ते स्वत: हुन स्थलांतरित होण्यास तयार झाले. त्यामुळे लवकरच ५०० एमएलडी पाण्याची व्यवस्था होईल. तेव्हा काळू धरण होईपर्यंत ठाण्यासह मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
  • म्हणुन शिवसेनेशी युती केली… दहा वर्षानंतर निवडणुका होत आहेत. आता दोन पिढ्या एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हे चित्र प्रत्येक पक्षात दिसत असल्याने इच्छुक वाढले. आमच्याही कार्यकर्त्याची स्वतंत्र लढण्याची इच्छा होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे आणि ठाणे हे त्यांच्या राजकीय ओळखीचे केंद्र आहे. या शहरात त्यांना दुखावणे योग्य नव्हते. यामुळेच कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी आम्ही कमी जागा घेऊन शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. असे स्पष्ट करून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रात हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रॅण्ड होता, आता कुणीही ब्रॅण्ड म्हणुन उभे राहिले तरी त्यांचा बॅण्ड वाजवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *