शिक्षकांचे आझाद मैदानात हुंकार आंदोलन सुरू

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील खाजगी प्राथमिक,माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतःअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०१५ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान वितरणाचे सुत्र लागू करत या शाळांना १ जानेवारी २४ पासून विनाअट टप्पा वाढ लागू करणे, शासनाच्या चुकीमुळे १२,१५ व २४ फेब्रुवारी २१ च्या शासननिर्णयान्वये शासन स्तरावर त्रुटी पात्र ठरलेल्या शाळांना निधीसह समान टप्पावाढ लागू करणे यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघावतीने मुंबईतील आझाद मैदानावर १६ ऑगस्ट पासून हुंकार बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आज ३९ दिवस उलटून गेले तरी सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. जो पर्यत शासन निर्णय (कागद) शिक्षकांच्या हातात पडत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.असा इशारा शिक्षक समन्वय संघाने दिला आहे. या आंदोलनात प्रा.राहुल कांबळे,
के.पी.पाटील,सौ.नेहाताई गवळी,
प्रा.संतोष वाघ,प्रा.दिपक कुलकर्णी,यांसह हजारो शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहे.
राज्यातील ‘कायम’ शब्द काढलेल्या प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व वर्गतुकड्यावर सुमारे ६५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ‘पंधरा ते वीस’ वर्षां पासून काही ‘विनावेतन’ तर काही तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. महाराष्ट्राच्या महान शैक्षणिक परंपरेचा हा अपमान आहे. शिक्षक दिनी शिक्षकांना देशाचे शिल्पकार,आधारस्तंभ म्हणायचे आणि त्यांच्या सेवेला वीस-वीस वर्षे झाली तरी विनावेतन राबवून घ्यायचे.एव्हढ्या प्रचंड कालावधीत विनावेतन आणि तुटपुंज्या वेतनावर काम करत असताना हे शिक्षक आपला उदरनिर्वाह कसा करत असतील याची जराही संवेदना राज्यकर्त्यांना नाही,या वेदना शासनापर्यंत पोहचवण्यासाठी शिक्षक समन्वय संघाच्यावतीने १६ ऑगस्ट पासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे .
PGB/ML/PGB
23 Sep 2024