साईभक्तांना भिखारी म्हणणाऱ्या सुजय विखेनी साईभक्तांची माफी मागावी

मुंबई, दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क): शिर्डीत देशभरातील लाखो भाविक साईबाबाचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिखारी म्हणाणारा भाजपाचा माजी खासदार सुजय विखे याला सत्तेचा माज आहे. सरंजामी मस्तीतून त्याने साईभक्तांचा अपमान केला आहे. अन्नछत्रातील जेवणाचा खर्च साईभक्तांनी केलेल्या दानातील पैशातून केला जातो, सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही, असे खडेबोल सुनावून साईभक्तांचा अपमान करणाऱ्या सुजय विखेने माफी मागावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
सुजय विखेच्या विधानाचा समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दररोज शिर्डीमध्ये लाखो साईभक्त भक्तीभावाने येत असतात, शिर्डी हे सर्व धर्मियांचे तिर्थक्षेत्र आहे. लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनानंतर दानपेटीत भक्तीभावाने दानही टाकतात. साईभक्तांच्या दानधर्मामुळे दरवर्षी जवळपास ८०० कोटी रुपये साई संस्थानकडे जमा होतात, या पैशातून साई देवस्थान भक्तांसाठी विविध योजना राबवित आहे. अन्नछत्र हे सुद्धा त्याच पैशातून सुरु आहे, यात सुजय विखेला अडचण काय? सुजय विखे व त्यांच्या कुटुंबाने वर्षोनवर्षे सत्तेत राहून कमावलेल्या भ्रष्ट पैशातून अन्नछत्र चालवले जात नाही. मोफत जेवण देण्याऐवजी मोफत शिक्षण द्यावे, असे सुजय विखे म्हणत आहे तर सुजय विखेने त्यांच्या शिक्षण संस्थांतून गोरगरिब व सामान्य कुटुंबातील मुलामुलांना मोफत शिक्षण द्यावे, लाखो रुपयांचे डोनेशन व भरमसाठ शिक्षणशुल्क घेऊन शिक्षणाचा धंदा कशाला मांडला आहे ? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
साईभक्तांना भिखारी म्हणून त्यांचा अपमान करूनही सुजय विखे आपल्या मतावर ठाम असल्याचे उन्मतपणे म्हणतो यातून त्याला किती माज आहे हे दिसते. जनता अशा माजोरड्यांचा माज उतरवते, लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगरच्या जनतेने सुजय विखेला दणका देऊन त्याची जागा दाखवली आहे, यापुढेही असाच प्रसाद विखे पितापुत्रांना जनता पुन्हा देईल, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
SW/ML/SL
6 Jan. 2025