ऊसदर आंदोलन यशस्वी , तोडगा निघाला, कारखानदारांची तडजोड
कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेउन आज तब्बल दहा तासांहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर ऊस कारखानदारांनी तडजोड करून अधिक भाव देण्याची तयारी दर्शविली आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरोली परिसरात चक्का जाम आंदोलन सुरू केले होते. आंदोलन तीव्र करण्याची तयारी करण्याचा इशारा देऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मागण्या मान्य होईपर्यंत महामार्गावर मुक्काम ठोकण्याची तयारी करण्यात आली होती.
मागील हंगामात गाळप केलेल्या ऊसाला १०० रुपये दुसरा हप्ता आणि यंदाची पहिली उचल ३५०० रुपये जाहीर मागणीसाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाला अद्याप गती न मिळाल्याने कारखानदारांची चांगलीच कोंडी झाली होती.
या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यात सायंकाळी उशिरा तोडगा निघाला , त्यानुसार गेल्यावेळी तोड झालेल्या उसाला अधिकचे शंभर रुपये आणि यावेळी एफ आर पी अधिक शंभर रुपये असा दर नक्की करून आंदोलन मागे घेण्यात आले.
आजच्या आंदोलना दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागण्या मान्य होईपर्यंत महामार्गावरच मुक्काम ठोकण्याची तयारी सुरू केली होती. राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी शिरोली परिसरात जमल्यामुळे किणी टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे बेंगलोर आणि पुणे दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्त्याच्या कडेला ५ हजार शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
ML/KA/SL
23 Nov. 2023