राज्यातील साखर निर्मितीमध्ये तब्बल ३० लाख टनांची घट

 राज्यातील साखर निर्मितीमध्ये तब्बल ३० लाख टनांची घट

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रमुख कृषी आधारित उद्योग असलेल्या साखर निर्मिती उद्योगाच्या कामगिरीत यावर्षी घसरण झालेली दिसुन येत आहे. राज्यातील साखर हंगाम जवळपास आटोपला असून साखर उतारा आणि साखरनिर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. चालू हंगामात ८० लाख टन साखरनिर्मिती झाली असून गतहंगामाच्या तुलनेत तब्बल ३० लाख टनांची घट झाली आहे. साखर उताऱ्याबाबत कोल्हापूर, सांगली वगळता सर्वच जिल्ह्यांची अवस्था काहीशी निराशाजनक आहे. साखर उताऱ्यात ०.७६ टक्के इतकी अत्यंत मोठी घट झाली आहे. कारखान्यांच्या आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. दरम्यान, गाळप, उतारा आणि साखरनिर्मिती या तिन्ही बाबतीत कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे.

राज्याचा हंगाम उशिरा म्हणजे १५ नोव्हेंबरला सुरू झाला तरीही मार्चअखेर आटोपला आहे. २०० कारखान्यांपैकी १९२ कारखाने बंद झाले आहेत. आतापर्यंत ८४७ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून अवघ्या ९.४७ टक्के उताऱ्यानुसार ८० लाख २६ हजार टन साखरनिर्मिती झाली आहे.

मागील वर्षी १०७३ लाख टन उसाचे गाळप होऊन १०.२३ टक्के उताऱ्यानुसार ११० लाख टन साखरनिर्मिती झाली होती. उताऱ्यात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांच्या एफआरपीवर आणि कारखान्याच्या साखरनिर्मितीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. ३० लाख टनांची घटही साखरउद्योगातील अर्थकारणावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. यामुळे सुमारे अकरा हजार कोटींचा फटका बसणार आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा गाळप (१२५ लाख टन) आणि उतारा (११.४१ टक्के) मिळवून निर्विवादपणे प्रथम स्थानावर आहे. त्यापाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात १०३ लाख टन गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यातील चौटा कारखान्यांनी १११ लाख टन गाळप करत तेहतीस कारखाने असलेल्या सोलापूरला (१०२ लाख टन) माग टाकत गाळपात तिसरे स्थान पटकावले आहे.

SL/ML/SL

2 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *