बिल्डरने फसवले, सायन – कोळीवाडा प्रकल्पग्रस्त नागरिकांची झाली परवड
मुंबई प्रतिनिधी, दि. 21 : मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या एसआरए प्रकल्पात गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत रहिवाशांनी राज्य सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. या प्रकल्पाचे विकासक हलकारा बिल्डर आणि त्यांचे भागीदार कॉसमॉस लँडमार्क यांनी अनेक आर्थिक व प्रशासकीय बाबी प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, विकासकांकडे सुमारे ११.२५ कोटी रुपयांचे थकीत भाडे, ५.७५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर आणि सुमारे २ कोटी रुपयांचा कॉर्पस फंड प्रलंबित असल्याचे आज जोसेफ शांतीमानव आणि मोहन गुप्ता यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. तसेच सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.
रहिवाशांना सध्या दरमहा केवळ १२ हजार रुपये भाडे दिले जात असताना शासनाच्या कागदोपत्री 26 हजार भाडे देत असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच प्रकल्पातील विक्रीसाठी असलेल्या सर्व ७७ सदनिका आधीच विकण्यात आल्याचा आणि संपूर्ण एफएसआय FSI व टीडीआर देखील वापरून संपवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे विक्री सदनिकांचे खरेदीदारही अडचणीत सापडल्याचे म्हटले जात आहे. संस्थेने ‘कलम 13/2’ अंतर्गत विकासक बदलण्याची मागणी करत वारंवार पत्रव्यवहार केला असतानाही सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी अद्याप कोणतीही सुनावणी घेतलेली नसल्याची तक्रार, तसेच इमारतीचे रंगकाम, गच्चीवरील पाईपलाईन यांसारखी
मूलभूत कामेही योग्य प्रकारे करण्यात आलेली नसल्याचा आरोप जोसेफ शांतीमानव यांनी केला.
निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्था
विशेष म्हणजे, या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी एसआरएचा कोणताही अधिकारी प्रत्यक्ष तपासणीसाठी आलेला नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, सरकारने ११.२५ कोटी रुपयांचे थकीत भाडे अदा करावे आणि रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र (O.C.) देऊन न्याय द्यावा, अशी मागणी मोहन गुप्ता यांनी केली.
दरम्यान, उच्च न्यायालयाने एसआरए प्रकल्पांतील विक्रीसाठीच्या सदनिकांपैकी २० ते ३० टक्के सदनिकांचा ताबा घेण्याचे आदेश दिलेले असतानाही या प्रकरणात सर्वच सदनिका विकण्यात आल्याने आता एसआरए प्रशासन विकासकाविरुद्ध कोणती कारवाई करणार, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे सायन-कोळीवाडा परिसरातील एसआरए प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.